Saturday, July 23, 2016

२३ जुलै हा प्रसारण दिन

भारतात दि. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. म्हणून दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आकाशवाणीच्या वाटचालीचा हा मागोवा…

‘नमस्कार! हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र. सकाळचे ६ वाजून ३५ मिनिटे झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम...’ बोलणारी व्यक्ती अदृश्य; तरीही परिचयाची. आवाजातील सातत्य आणि न चुकता तो ऐकण्यातील नियमितता... अशावेळी कुठल्याही दृश्याकृतीची गरज भासत नाही. आपोआपच एक अनामिक बंध जुळला जातो. हा मर्मबंध आता नव्वदीत पदार्पण करीत आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’- आकाशवाणी २३ जुलै रोजी ८९ वर्षांची पूर्तता करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे स्वातंत्र्योत्तर काळात ‘आकाशवाणी’ (१९५७) असे नामकरण झाले. ‘आकाशवाणी’ हे संयुक्तिक नाव थोर साहित्यिक व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी सुचविले होते. त्यानंतर सुरु झालेली आकाशवाणीची वाटचाल हा भारतीय संस्कृतीच्या आणि एकूणच भारतीयत्वाच्या सर्वंकषतेचा परिपाकच म्हणावयास हवा.

देशभरात आकाशवाणीची ४१० केंद्रे असून 20 अवघ्या महाराष्ट्रातच आहेत. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान ते विभिन्न कला-सांस्कृतिक मूल्यांची रुजवात, रोजच्या घडामोडी ते आदर्शवत जीवनपद्धतीचा अवलंब अशा अनेकविध गोष्टी अबालवृद्धांसहित प्रत्येक वयोगटासाठी हाताळण्यातील संवेदनशीलता, जवळपास 23 भाषांतील प्रसारणाचा प्रचंड आवाका आणि मागील 89 वर्षे सातत्याने त्यातील भाषिकस्तर कायम राखण्याचे कसब, या सर्व गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत. सध्याच्या झगमगीत सभोवतालात उथळपणाचे प्रमाण वाढत असताना आकाशवाणीने आपल्या मूल्यांशी असलेली बांधिलकी कायम जपली आहे, जपते आहे.

जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला. सुरुवातीला मात्र आकाशवाणी हे मनोरंजन व जनप्रबोधनाचं, सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम होतं.

‘संगीत सरिता’ ही शास्त्रीय संगीताच्या जलशांची वाहिनी तर ‘विविध भारती’ या आकाशवाणीच्या व्यावसायिक वाहिनीवरुन विविध सिनेसंगीत प्रसारित होतात. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे राज्यांतर्गत येणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरुन त्या-त्या राज्यभाषेतील सुगम-संगीतांचे कार्यक्रम होतात. नाट्य-संगीत हे सुरुवातीला सुगम-संगीत या प्रकारात समाविष्ट होते. परंतु त्यातील शब्द-स्वरांचा सुरेख समन्वय लक्षात घेऊन त्यास आकाशवाणीतर्फे उपशास्त्रीय संगीताचा दर्जा देण्यात आला. आजही कुठल्याही सच्चा कलाकारांसाठी आकाशवाणीकडून मिळणारी कौतुकाची थाप ही गौरवान्वित करणारी आहे. कारण श्रोत्यास जे उत्तम आहे ते देण्याचा आकाशवाणीचा ध्यास असल्याने कुठलीही गोष्ट स्वीकारताना त्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो.

मनोरंजनासोबतच बाल, युवा, महिला यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गंमत-जंमत, युवावाणी, वनिता मंडळ असे कार्यक्रम प्रसारित होतात. अशा कार्यक्रमातून त्या-त्या वयोगटाचे भावविश्व व्यक्त होत असते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जडण-घडण होत असते. त्याचप्रमाणे कामगार सभा, कृषीवाणी, ‘माझं आवार माझं शिवार’ अशा माहितीपर कार्यक्रमांचा कामगार आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होतो. त्यामुळे आकाशवाणी ही कित्येकांच्या रोजच्या जगण्यातील आधारस्तंभ बनली आहे.

विविधतेतून एकता ही उक्ती आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांमधून सार्थ ठरते. भारतातील विविध प्रांतातील कलाकार त्यांच्याकडे खास प्रचलित असणारे लोकसंगीत सादर करतात. त्याचं ध्वनिमुद्रण त्या-त्या राज्यांतर्गत असणाऱ्या आकाशवाणी केंद्रात होतं आणि एक विशिष्ट वेळ व दिवस ठरवून संबंध भारतात त्यातील एका प्राताचे संगीत प्रसारित होते. त्यामुळे अशा प्रत्येक प्रांताची सांगितिक ओळख याद्वारे संपूर्ण भारताला होते. तसचं नाटकाचही. अर्थात येथे नाटक म्हणजे वाचिक अभिनय! भारतातील एखाद्या भाषेत लिहिलेले एखादे नाटक, ज्याचे हिंदीत भाषांतर करुन (हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने) ते भारतातील विविध आकाशवाणी केंद्रात पाठविले जाते. तेथे त्या-त्या प्रांतीय भाषेनुसार नाटकाचे भाषांतर होते. मग महिन्याभरात एक दिवस निश्चित करुन संपूर्ण भारतात ते नाटक प्रसारित होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या माणसाला काश्मिरी चालीरिती कळतात, कानडीमधल्या काही म्हणी माहिती होतात. त्यामुळे विविधतेतून एकता साधली जातेच; पण व्यक्तिगत प्रत्येकाचाही सर्वांगीण विकास होतो.

यात एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. येथे पुनर्प्रसारण, ज्याला आपण रिपीट ब्रॉडकास्ट म्हणतो, ते एक-दीड-दोन वर्षांतून कधीतरी होते. कारण येथे सृजनशीलतेला बराच वाव असून श्रोत्यांना उत्तम व सकस खाद्य- ‘कंटेट’- पुरविण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरुन प्रसारित होणारी कुठलीही गोष्ट ही संयत असते. त्यात ना ‘ब्रेकींग न्यूज’चा धडाका असतो, ना भावनांचा उद्रेक! निर्मळ आनंद देताना वास्तवाची जाणीव आणि त्यातूनही चांगलं कसं शोधावं हा विचार आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना देत असते. यात सतत बदलणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना आकाशवाणीने विकसित केलेले स्वतःचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे अॅप असेल, ‘न्यूज ऑन एअर’ अंतर्गत दर तासाला एखादा नंबर फिरवून चालू घडामोडीतील कुठल्याही तीन बातम्या मिळवणे असेल, आपल्या बलस्थानांवर भर देऊन, आपलं मूळ टिकवून नव्या जगाशी- नव्या काळाशी जोडले जाणे हे आकाशवाणीच्या नव्वदाव्या पदार्पणातलं तिच्यासमोरचे ध्येय आहे. कारण ज्यावेळी ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं’, अशी प्रतिक्रिया आकाशवाणीतील उमा दीक्षितांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांना श्रोत्यांकडून मिळते. इतक्या वर्षांचे सहसंबंध दृढ होत असतातच; पण त्याचबरोबर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही बहुआयामी उद्घोषणा सार्थ ठरत असते.

No comments:

Post a Comment